MAKH

मॅक च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन  उत्साहात संपन्न…

मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास मा. श्री. मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, ईएसआयसी हॉस्पिटल चे डॉक्टर, मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर तसेच इतर मॅकचे संचालक, सल्लागार व निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजक तसेच ईएसआयसी हॉस्पिटल व अग्निशमन कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती होते.

सर्वप्रथम सदर कार्यक्रम प्रसंगी मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, मा. श्री. मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, मॅक चे संचालक संजय पेंडसे, सल्लागार सचिन कुलकर्णी, गोरख माळी यांनी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यव्क्त केले व देशाला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहाने सर्वत्र संपन्न होत आहे त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत असे नमूद केले व संस्थेने केलेल्या व करीत असलेल्या कामकाजाचा आढावा तसेच पर्यावरण , सोई सुविधा व करप्रणाली याबाबत सविस्तर माहिती मांडण्यात आली.  

मे. टेक्नोमेट इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर मा. श्री. विजय सोमाणी साहेब यांनी सांगितले की, मॅक असोसिएशन ही संस्था सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून संस्थेच्या माध्यमातून उद्योगासाठी लागणारे पाठबळ उद्योजकांना संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व मान्यवर उद्योजक देत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व संस्थेच्या वतीने नवीन उभारण्यात येत असलेल्या वास्तू करिता मे. टेक्नोमेट इंडस्ट्रीजच्या वतीने विजय सोमाणी साहेब यांनी रक्कम रुपये २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार मात्र) निधी देणगी म्हणून दिली. मॅक च्या वतीने मा. श्री. विजय सोमाणी साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले व सत्कार करण्यात आला.

मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे. त्या सर्व महापुरुषांना,सैनिकांना आपण वंदन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करीत आहोत. सदर दिवस हा सुवर्णमय असून त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे असे नमूद केले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी, समाजसेवकांनी तसेच क्रांतीकारकांनी आयुष्य वाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय, अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी कृपलानी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, रासबिहारी बोस, गोपाळ कृष्ण गोखले, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, केशवचंद्र सेन, अरविंद घोष, वासुदेव बळवंतरराव फडके, क्रांतीसिंह नाना पाटील, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दिन तयैबजी, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास अशांचा उल्लेख केला जातो. ही यादी संपणार नाही कारण अशा नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले.

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,

शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्!

असे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत. अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. तरच, आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम !

संस्थेच्या माध्यमातून पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील असणार्‍या उद्योजक व कामगार बंधू यांच्या करिता विविध उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये महारक्तदान, महाआरोग्य शिबीर, विविध सेमिनार्स तसेच विविध सोई -सुविधा उपलब्ध केलेचे नमूद केले. अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही, ट्रक ट्रमिनल, पर्यावरण सेवा शुल्क, वृक्षारोपण, ईएसआय हॉस्पिटल च्या माध्यमातून होत असलेली आरोग्य सेवा इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत सविस्तर माहिती दिली व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट च्या अनुषंगाने स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष संजय पेंडसे व सर्व टिमचे हार्दिक आभार व्यक्त केले तसेच संस्थेच्या वतीने नवीन उभारण्यात येत असलेल्या वास्तू करिता ज्या मान्यवर उद्योजक बंधू- भगिनींनी तसेच बिल्डिंग कमिटी अध्यक्ष संजय जोशी व सर्व टिमचे मनापासून  आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक अशोक दुधाणे,संजय पेंडसे, संजय जोशी, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, शिवाजीराव भोसले, संगमेश पाटील, सल्लागार सदस्य गोरख माळी, श्रीनिवास कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळूगडे, मॅक सभासद विजय सोमाणी, जयराज पाटील तसेच इतर मान्यवर उद्योजक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मॅक चे ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर यांनी मानले.